चुकलेला एक प्रयोग...
चुकलेला एक प्रयोग....!
पृथ्वीवर 3.8 अब्ज वर्षांपासून जीवसृष्टी अस्तित्वात आहे.
एका पाण्याच्या थेंबातून सुरू झालेला प्रवास…
निरव शांततेत निर्माण झालेलं पहिलं जीवपिंड…
हळूहळू कणाकणाने जगायला शिकत गेलं. कधी समुद्राच्या खोल तळाशी, कधी डोंगराच्या शिखरावर…
कधी उष्णतेने तापलेल्या वाळवंटात, तर कधी गोठलेल्या हिमनगांवर —
जीवसृष्टीने आपली जागा शोधली… टिकून राहण्यासाठी जिवाचं रान केलं. प्रत्येक बदलाला सामोरं गेलं, नव्याने शिकत राहिलं… मरणाच्या उंबरठ्यावर उभं राहूनही न सोडलेलं जीवनाचं स्वप्न…
यातूनच निर्माण झाला उत्क्रांतीचा अद्भुत प्रवास —
चार्ल्स डार्विनच्या शब्दांत सांगायचं तर "Survival of the fittest."
जो लढला, तो वाचला.
जो जुळवून घेत गेला, तो पुढे गेला.
ज्यांनी हार मानली, ते इतिहासाच्या पानांत विरले.
आणि अशा या अब्जावधी वर्षांच्या निसर्गाच्या प्रवासात
कधीतरी माणूस जन्माला आला किंवा असं म्हणावं लागेल — निसर्गाच्या सर्वात नाजूक आणि अजूनही अपूर्ण प्रयोगापैकी एक… माणूस.
त्याचं शरीर इतरांपेक्षा नाजूक, पण मेंदू ताकदवान.
पण या मेंदूनं, मनानं, बुद्धीनं तो विसरला —
की तो निसर्गाचाच एक भाग आहे.
ज्यांना पोट भरलं की मागं वळून बघावं लागतं,
तेच शांत राहतात.
पण माणूस…
पोट भरल्यावरही, ओरबाडण्याची वृत्ती याच्याच थायी.
जमीन, नद्या, पर्वत, जंगलं, प्राणी…
जे काही दिसेल, त्याला आपल्या स्वार्थासाठी झपाटून लुटतो.
उत्क्रांतीनं दिलेली बुद्धी — तो वापरतो, पण संवेदनांचं काय?
एका जीवपिंडापासून सुरू झालेला हा प्रवास —
आज माणसाच्या मूर्खपणामुळे संपणाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
प्रश्न एवढाच आहे…
आपणच जर या साखळीची अखेर ठरणार असू,
तर आपण खरंच "सर्वोत्तम प्रजा
ती" आहोत का?
की फक्त… चुकलेला एक प्रयोग?
Comments
Post a Comment